फुटेना तुटेना चळेना ढळेना ।
सदा संचलें मीपणें तें कळेना ॥
तया येकरूपासि दूजें न साहे ।
मना संत आनंत शोधूनि पाहे ॥ १४७ ॥
पूज्य तात्यासाहेब केतकरांच्या मुखातून गोंदवलेकर महाराज अनेक वर्षे बोलायचे हे आपल्यापैकी काही जणांना माहिती असेलच. तात्यासाहेब पेटीवर बसले की महाराज बोलतात यावर काही भक्तांचा आधी विश्वास बसला नाही. नंतर हळू हळू जेव्हा गोंदवलेकर महाराजांनी अशा काही गोष्टी सांगितल्या ज्यामुळे वाणी रूप महाराज नक्की तेच आहेत हा संशय मनातून गेला. तो संशय कसा गेला त्याचा हा प्रसंग पुढे देत आहे . वाणी रूपातील महाराज जेव्हा सकाळी प्रवचन करीत. त्यांची भाषा अत्यंत मृदू आणि मधाळ होती. सोप्या शब्दात ते वेदांत समजावून सांगत . तेथे जमलेले काही निवडक भक्त अगदी मंत्र मुग्ध होत. त्यातील काही भक्त पूज्य तात्यासाहेब केतकर (वाणी रूपातील महाराज) यांना घरी आमंत्रण करीत. ज्या प्रमाणे वेळ असेल त्याप्रमाणे तात्यासाहेब भक्त मंडळींच्या घरी जात आणि तिकडे प्रवचन आणि प्रसाद याचा कार्यक्रम होत असे. असेच एकदा त्यांचे प्रवचन झाल्यावर घरातील मंडळी नमस्कार करायला आली. महाराज त्या सगळ्यांशी अत्यंत आपुलकीने वागत आणि त्यांना प्रापंचिक आणि पारमार्थिक प्रश्न बाबत मार्गदर्शन करीत. सगळ्या भक्तांचे दर्शन झाले आणि मग महाराजांनी विचारले अजून कोणाला भेटायचे आहे का ? घरातील यजमान म्हणाले सगळे झाले. कोणी राहिले नाही. तरी महाराज विचारले आत कोण राहिले आहे का तर यजमान म्हणाले घरातील कामवाली बाई आहे. महाराज म्हणाले त्यांना सुद्धा बोलवा. कामवाल्या बाईंचे दर्शन झाले तरीसुद्धा महाराजांनी परत विचारले "अजून कोणी राहिले आहे का ?आतल्या खोलीत कोण बसले आहे ?". तेव्हा घरातील यजमान अत्यंत संकोचून म्हणाले माझे वडील आहेत. पण ते नास्तिक आहेत त्यामुळे ते काही बाहेर आले नाहीत. कारण त्यांचा वाणीरूप अवतारात बोलणे आणि रामाची भक्ती करणे यावर विश्वास नाही. महाराज अत्यंत आपुलकीने आणि मृदू स्वरात म्हणाले " नुसते भेटायला यायला काहीच हरकत नाही ना ? रामाला नमस्कार करायलाच पाहिजे असे काही नाही. त्यांना भेटायचे नसेल तरी मला त्यांना भेटायचे आहे. त्याला त्यांची काही हरकत नसावी". अत्यंत नाईलाज झाला म्हणून यजमानांचे वडील बाहेर आले. पूज्य तात्यासाहेब केतकर यांनी त्यांची विचारपूस केली आणि महाराजांनी विचारले "ओळखलंत का?". वडील पेशाने वकील होते त्यामुळे ते एकदम तत्परतेने आणि बाणेदारपणे म्हणाले "आपण भेटलोच नाही तर ओळख कशी असेल ?". महाराज त्यांना म्हणाले "तुम्ही ४ वर्षे वयाचे असतांना तुम्ही आजी बरोबर आला होतात आणि त्या वेळेस काही क्षणांसाठी आपली नजर भेट झाली होती असे म्हणून त्यांनी सगळं प्रसंग सविस्तर सांगितला. वडिलांना थोडे आठवले. महाराजांनी अजून ओळखीच्या काही गोष्टी सांगितल्या. मग त्यांची खात्री पटली की पूज्य तात्यासाहेब केतकरांच्या मुखातून गोंदवलेकर महाराज बोलत आहेत. त्यांचा बुद्धीचा अहंकार आणि मीपणा गळून पडला. त्यांना जाणवले की महाराज बाहेरच्या खोलीत असून सुद्धा त्यांना आपल्याला सुक्षम रूपाने आतल्या खोलीत बघितले, ६० वर्ष पूर्वीचे आठवले. आपल्या स्वतःच्या बुद्धीला जे कळत नाही आणि विज्ञानाच्या नियमाच्या पलीकडे सुद्धा एक विश्व आहे. महाराज देह रूपाने गेले असतील तरी सूक्ष्म देहात आहेत. म्हणजे ते साक्षात ब्रह्मच आहेत. ब्रह्माण्डनायक राजाधिराज याचा खरा अर्थ त्यांना उमगला. हे जे गुप्त आणि पंचेन्द्रयांना न दिसणारे ब्रह्म आपल्या समोर सध्या सगुणात उभे आहे याची त्यांना मनोमन खात्री झाली. जसं सोन्याची अंगठी, सोन्याचे चेन आणि सोन्याचे वळे या तिन्ही मध्ये सोने कायम आहे. दागिन्याचा आकार बदलला तरी सोने काही बदलत नाही, ते तुटत नाही, फुटत नाही, नष्ट होत नाही. प्रत्येक दागिन्यात सोनेच असते तसेच ब्रह्माण्डतल्या प्रत्येक वस्तू मध्ये ब्रह्म आहे. आपल्याला ते दिसत नाही पण भक्त प्रल्हादाला ते दिसले. हिरण्य कश्चपु यांला ते ब्रह्म दिसले नाही. त्याने लाथ मारल्यावर खांबातून ब्रह्म प्रगट झाले. तसेच महाराजांनी त्यांना या प्रसंगातून आपले अस्तित्व त्या वडिलांना दाखवून दिले आणि नंतर अनुग्रह दिला.
या १४७ क्रमांकाच्या श्लोकात समर्थांनी जे लिहिले आहे तेच दासबोधात विस्ताराने समजावले आहे . त्या ओव्या आणि त्याचा अर्थ खाली देत आहे ज्याने हा श्लोक अजून चांगला समजायला मदत होईल
पृथ्वी आप तेज वायो आकाश | यां सबाह्य जगदीश | पंचभूतांसी आहे नाश | आत्मा अविनाशरूपी ||६-२-१२||
जें शस्त्रें तोडितां तुटेना | जें पावकें जाळितां जळेना | कालवितां कालवेना | आपेंकरूनी ||६-२-१६||
जें वायोचेनि उडेना | जें पडेना ना झडेना | जें घडेना ना दडेना | परब्रह्म तें ||६-२-१७||
पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश यांना सूक्ष्म परब्रह्माने सबाह्य-आतबाहेर संपूर्ण व्यापलेले आहे, महाभूते नाशिवंत असून तो सूक्ष्म परमात्मा मात्र अविनाशी आहे. जें जें रूप आणि नाम आहे, ते ते सगळे ’आवघाचि भ्रम’ आहे; जे शस्त्रांनी तुटत नाही, विस्तवाने जळत नाही, पाण्याने भिजवून कालवता येत नाही, वार्याने उडून जात नाही, पडत नाही, झडत नाही, घडवता येत नाही, लपवता येत नाही ते परब्रह्म होय. ना रंग ना वास असं ते सर्वाहून वेगळेच असते, मात्र सदा सर्वकाळ असतच असते, निरंतर असते, असे ते ब्रह्म होय. जरी दिसत नाही म्हणून काय झाले ? ते सर्वत्र भरून राहिलेले असते. ते सूक्ष्मपणे सगळीकडे दाटून जेथे तेथे व्यापून असते. जे दिसेल ते पाहण्याची आपल्या दृष्टिस संवय लागलेली असते पण जे रहस्य असते ते गुप्तच असते, हे समजावे.
जें शस्त्रें तोडितां तुटेना | जें पावकें जाळितां जळेना | कालवितां कालवेना | आपेंकरूनी || ६-२-१६||
जें वायोचेनि उडेना | जें पडेना ना झडेना | जें घडेना ना दडेना | परब्रह्म तें ||६-२-१७||
ज्यासी वर्णचि नसे | जें सर्वांहूनि अनारिसें | परंतु असतचि असे | सर्वकाळ ||६-२-१८||
दिसेना तरी काये जालें | परंतु तें सर्वत्र संचलें | सूक्ष्मचि कोंदाटलें | जेथें तेथें ||६-२-१९||
दृष्टीस लागली सवे | जें दिसेल तेंचि पाहावें | परंतु गुज तें जाणावें | गोप्य आहे ||६-२-२०||
जे शस्त्रांनी तुटत नाही, विस्तवाने जळत नाही, पाण्याने भिजवून कालवता येत नाही, वार्याने उडून जात नाही, पडत नाही, झडत नाही, घडवता येत नाही, लपवता येत नाही ते परब्रह्म होय. ना रंग ना वास असं ते सर्वाहून वेगळेच असते, मात्र सदा सर्वकाळ असतच असते, निरंतर असते, असे ते ब्रह्म होय. जरी दिसत नाही म्हणून काय झाले ? ते सर्वत्र भरून राहिलेले असते. ते सूक्ष्मपणे सगळीकडे दाटून जेथे तेथे व्यापून असते. जे दिसेल ते पाहण्याची आपल्या दृष्टिस संवय लागलेली असते पण जे रहस्य असते ते गुप्तच असते, हे समजावे.
थोडक्यात समर्थ इथे या श्लोकात सांगत आहेत जे तुटत फुटत नाही, आपल्या स्थानावरून ढळत नाही, कधी नाश पावत नाही, चिरंतन असे आहे पण अहंकारामुळे माणूस पाहू शकत नाही, जे एकमेवाद्वितीय आहे त्या अनंताचा शुध्द मनाने शोध करत राहावे.या प्रसंगातील वकिलांना अहंकारामुळे वाणी रूप महाराज दिसत नव्हते आणि महाराजांनी त्यांना आपल्या जुन्या प्रसंगातून ब्रह्माचे अस्तित्व दाखवले आणि त्यांचा अहंकार आणि मी पणा गळून पडला
संदर्भ आणि आभार: ज्येष्ठ साधक पूज्य बोन्द्रे यांच्या कडून दिनांक ७-१-२०२१ ला वाणीरूप महाराजांचा प्रसंग कळला आणि श्लोक समजावून घ्यायला मदत झाली. त्यांना नमस्कार आणि त्यांचे आभार.
