विचारे मना तूचि शोधूनि पाहे
॥
मना त्वाचि रे पूर्वसंचीत केले ।
त्यासारखे
भोगणे प्राप्त झाले ॥ ११ ॥
सुख ही गोष्टच अशी आहे की, जी प्रत्येकाला हवी असते. तहानल्या
हरणाने मृगजळामागे धावत राहावे आणि मृगजळाने मात्र दूरदूर पळत राहावे तसे आपण त्याच्या
मागे धावतो आहोत. सुख मिळेल का हो बाजारी, सुख मिळेल का हो शेजारी, या आशेने कायम असमाधानी
राहतो आहोत. कोणी व्यसनांमध्ये, कोणी पैशामध्ये, कोणी इंद्रि उपभोगात तर कोणी आणखी
कशाकशात सुखाचा शोध घेत आहे; परंतु या सगळ्या गोष्टी क्षणभंगुर हे माहित असून सुद्धा
आपण सगळे धावत आहोतच. अलिशान घर, गाडी, जाडजूड बँक बॅलन्स म्हणजे सुख असू शकेल काय?
भौतिक सुखाच्या सगळ्या गोष्टी आर्थिक सुबत्तेने घेता येतात पण सुख, मजा, आनंद विकत
घेता येऊ शकतो का? बहुधा खूप संपत्ती जमा केल्यावर सुख मिळवणं थोडं सोपं जात असावं.
अर्थात ते पुन्हा तुमच्या सुखाच्या व्याख्येवर अवलंबून आहे. माणसांसोबत जोडलं जाण्यात
काहींना सुख वाटतं तर काहींना फक्त पैसे कमवण्यात. पैसा हे साध्य नसून साधन आहे,
हेच आपल्या लक्षात येत नाही. पैशाने कदाचित सुखसोयी विकत घेता येतील; पण त्याने सुख
नाही मिळणार कारण ते आपल्या आत मध्येच आहे आणि आपण ते बाहेर शोडतो आहोत. बाजारात औषध
मिळेल; पण आरोग्य नाही. चष्मा मिळेल; पण दृष्टी नाही तसेच सुखाचे आणि समाधानाचेच्या
बाबतीत पण आहे. सुखाची व्याख्याच न ठरवता आल्याने दु:खाची संगत करावी लागते. संस्कृतमध्ये एक सुंदर सुभाषित आहे, अर्थानाम् अर्जने दु:खं, अर्जितानांच रक्षणे दु:खं,
व्यये दु:खं धिक् वित्तसंचयः।। परंतु याच पैशांच्या हव्यासापोटी आपण प्रत्येक जण
काहीना काही वाईट गोष्टी करतो किंवा काही केले नाही तरी मनात तरी येतेच. भरपूर पैसे,
समाजात मान, सुंदर बायको, उच्च शिक्षित आणि कमावती मुले, घर दार, जमीन जुमला इ सगळं
ज्या माणसाकडे गेले अनेक वर्ष सदोतीत आहे अशा माणसाला सुद्धा विचारले तर त्याला सुद्धा
सुखी आहे असे वाटते नाही. कारण त्याच्या मनात काहीतरी कमी आहे असे वाटतच राहते. काही
लोकांना वर वर सगळे सुख आहे असे वाटले तरीही त्यांना आपल्या पेक्षा इतरांना जास्त
मिळाले आहे या बद्दल असूया आणि मत्सर असतोच असतो. म्हणजे वरवर जरी तो सुखी आहे असे
दाखवत असला तरी आतून तो दुःखी असतोच. म्हणून समर्थ म्हणतात "जगी सर्व सुखी असा
कोण आहे? तूच स्वतः जनीं सर्वसूखी असा कोण
आहे । विचारे मना तूचि शोधूनि पाहे ॥ कारण असे की पैसा मिळवताना दु:ख, तो मिळवल्यानंतर
त्याचं रक्षण करताना दु:ख. आणि सगळं सुख असलं तरी सध्याचे सुख कायम राहील का याची चिंता
तर प्रत्येक माणसाला असतेच म्हणून तर ते गाणे आहे "जीवनात ही घडी अशीच राहू
दे ". समर्थानी आणि इतर संतांनी ओळखले की अशी घडी “तशीच” कधीच राहणार नाही.
या पार्श्वभूमीवर मला दगडगोटे खात, शेणमार सहन करीत मुलींना शिकवायला जाणाऱ्या सावित्रीबाई
आठवतात. दुर्गम आदिवासी भागात सेवाभावी वृत्तीने काम करणारे डॉ. प्रकाश आमटे, डॉ. रवींद्र
कोल्हे, कुष्ठरोग्यांसाठी आनंदवन निर्माण करणारे बाबा आमटे या सर्व लोकांची सुखाची
व्याख्या तरी कोणती होती? अशी कितीतरी उदाहरणे मला आठवतात. या वरून आपण समाधान हेच
परम सुख आहे, अशी व्याख्या काहींनी केली आहे. परंतु तीसुद्धा बरीच संदिग्ध आहे. कारण
समाधान म्हणजे तरी काय, हाही प्रश्नच आहे. ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असू
द्यावे समाधान,’ असे संतांनी म्हटले आहे; माणसाला निष्क्रिय बनवणारी आहे असे वरवर विचार
केला तर काही लोकांनां वाटते. परंतु सगळ्या संतांनी, भगवंत गीते मध्ये आणि समर्थांनी
प्रयत्न करू नका असे सांगितलेच नाही. प्रयत्न मना पासून आणि भरपूर करा आणि त्यात यश
आले नाही तर त्याचे दुःख करत बसू नका. प्रारब्धात मधील मागच्या जन्मीचे भोग आहेत असे
ते पुढल्या ओवीत सांगत आहेत मना त्वाचि रे
पूर्वसंचीत केले । त्यासारखे भोगणे प्राप्त झाले.
प्रारब्ध म्हणजे न समजणार्या गोष्टींचे कारण होय, असे म्हणायला
हरकत नाही. संतांनादेखील त्यांचे प्रारब्ध भोगावे लागते, पण त्यांना देहबुद्धी नसल्याने
भोगाचे सुखदुःख त्यांना नाही. एक मनुष्य रस्त्याने चालला असताना वाटेत एक दहा रुपयांची
नोट पडलेली आढळली. पूर्वसंस्काराप्रमाणे ती उचलून घेण्याची वासना त्याला होईल, पण ती
प्रत्यक्ष उचलून घ्यावी किंवा न घ्यावी हे ठरविण्याचे स्वातंत्र्य त्याला आहे.
म्हणून प्रारब्धाने देहभोग आला असता त्यामध्ये मनाची वृत्ती कशी ठेवावी हे स्वातंत्र्य
त्याला आहे . ते प्रारब्धावर अवलंबून नाही. जगात सदैव सुखी कोणीच नसते आणि प्रत्येकाच्या
पूर्वकर्मा नुसार त्याच्या वाटयाला काही दुःख येतात ती त्याने आपण आनंदाने भोगून संपवुन
टाकावी. दुःख भोगत असतांना भगवंताचे स्मरण केल्याने दुःखाचा मनावर परिणाम कमी होईल.
मग दुःख असले तरी बिघडले कुठे? सगळीकडे भगवंत आहे तर जीवनात दुःख असावेंच का? असा
एक प्रश्न विचारवंतांना बहुधा बोंचत असतो. त्याचे उत्तर समर्थ तिसर्या व चौथ्या ओळींत
देत आहेत. "मना त्वांचि रे पूर्वसंचीत केलें । तयासारखें भोगणें प्राप्त झालें
॥" त्यासाठी त्रिकालाबाधित एक नियमासच कर्मविपाकाचा सिद्धांत असे म्हणतात.
कर्मविपाका सिद्धांत म्हणजे मागच्या जन्मीचे पाप आणि पुण्य कर्म नुसार तुमच्या वाटेला
दुःख आणि सुख येणार. हा सिद्धांत काही विद्वान लोकं मनात नाहीत पण गीते पासून सगळे
संत यावर लिहितात आणि अनुभवाने बोलतात तर आपण यावर विश्वास का ठेवू नये याचे उत्तर
त्या विद्वान लोकांकडे नसते. जे विज्ञानाने सिद्द करता येत नाही त्यावर विश्वास का
ठेवावा असे त्यांचा युक्तिवाद असतो. अग्नीचा शोध, विजेचा शोध, गुरुत्वाकर्षणाचा शोध,
अणुगर्भाच्या स्वरूपाचा शोध, हे शोध जसे माणसाच्या बुद्धिमत्तेचे आणि विज्ञानाच्या
प्रगतीचे द्योतक आहेत तसाच कर्मविपाकाचा सिद्धांतहिं आहे. विज्ञानाची शक्ती तिथं
पर्यंत अजून पोहोचू शकली नाही इतकेच. पण सिद्धांत खरा आहे. त्यांचे असे म्हणणे
असते की कर्मविपाक मानल्यामुळे कर्तृत्वाला बाधा येते आणि मनुष्य दैववादी बनतो. पण
हे मानणे चुकीचे आहे. जसे गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतामुळे माणसाने चालणें, फिरणें,
चढणे सोडून द्यावे आणि नुसते बसून रहावे असे जसे होत नाही तसेच कर्मविपाकाच्या सिद्धांताने
मनुष्य निष्क्रिय होतो असे मानण्याचे कारण नाहीं. माणसे आळशी असतात याचा जसा गुरुत्वाकर्षणाच्या
नियमाशी संबंध नाहीं, तसाच कर्मविपाकामुळे माणूस दैववादी वा प्रयत्नवादी ठरत नाहीं.
कर्मविपाकानें दैववादाला प्रोत्साहन मिळण्याच्या ऐवजी प्रयत्नवादालाच प्रेरणा मिळण्याची
शक्यता अधिक आहे.. भूतकाळावर माझे कोणतेहि नियंत्रण नाहीं. पण वर्तमानकाळ ही माझ्या
स्वाधीनची गोष्ट आहे. त्यामुळे भविष्यकाळ मी माझ्या इच्छेप्रमाणे घडवू शकेन असा विश्वास
कर्मविपाकाच्या सिद्धांतामुळे माणसाच्या अंगांत बळावण्याची शक्यता आहे. पूर्वसंचित
हा माझ्या कर्तृत्वाचा भाग आहे. तें केव्हा तरी माझ्या कर्तृत्वातून, मी केलेल्या बर्या-वाईटांतून,
निर्माण झाले आहे. तो योगायोग वा अपघात नाहीं असे शास्त्र सांगते ते फार महत्त्वाचे
आहे. पूर्वकर्मामुळे आता काही दुःख असतील तरी मी ती भविष्यकाळ माझ्या सध्याच्या
सत्कृत्यांच्या बळावर सुधारून घेईन असा आत्मविश्वास याच कर्मविपाकामुळे माणसांच्या
मनात जागृत ठेवतो. त्यालाच WILL POWER म्हणतात. आपल्या संस्कृतीमध्ये कर्माचे
संचित, क्रियमाण आणि प्रारब्ध असे तीन भाग पाडलेले आहेत. जे प्रत्यक्ष करीत असतो ते
क्रियमाण, जें प्रत्यक्ष भोगीत असतो ते प्रारब्ध आणि जें निर्माण झाले आहे आणि भोगावयाचे
राहिले आहे ते संचित. या श्लोकात गीते मधील
तत्वज्ञान सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत समर्थानी सांगितले आहे आणि पुढील १२व्या श्लोकात यावर उपाय सुद्धा सांगितला
आहे. दुःख हें टाळता येण्यासारखें नाहीं त्याला
तोंड द्यावे लागणारच आहे हे लक्षात आले तर माणसाची मानसिक सिद्धता होते. म्हणून समर्थ
दुःखाची अपरिहार्यता या श्लोकानें सांगत आहेत. पुढील आयुष्यात सुख आणि समाधान मिळावे
म्हणून आज सदाचाराने वर्तन करावे आणि सध्या असेलेली दुःख भोगायला शक्ती देणारा हा ११वा
श्लोक म्हणजे २०५ श्लोकांमधील मुगुटमणी आहे.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।



