मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे । मना बोलणे नीच सोशीत जावे ॥
स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे
। मना सर्व लोकांसि
रे नीववावे ॥ ७ ॥
आपल्या समाजात एक
चुकीचा समज आहे की अध्यात्मिक मार्गावर वाटचाल करणारे लोक मनाने कमकुवत असतात आणि त्यांना
संकटांना तोंड द्यायची ताकद नसते. ते रामाचा आधार शोधतात कारण त्यांची मानसिक शक्ती
कमी असते आणि ते मनाने खूप घाबरट असतात . या श्लोकात समर्थांना सांगायचे आहे की ज्या क्षणी मनुष्य साधना करायला सुरुवात करतो त्याने
लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की लोक निंदा , विरोध आणि टिंगल करणारच आणि त्याला तोंड देण्यासाठी त्याने स्वतः चे मानसिक
बळ वाढवणे गरजेचे आहे. एकांतांत साधना सुरु केल्यानंतर धैर्याने अशा अपमान आणि टिंगल
करण्याऱ्या लोकांना तोंड द्यायला शिकावे .
शिवाय साधकाला जिद्द हवी आणि हतबलता येऊ देऊ नये. आपण काकस्पर्श हा मराठी चित्रपट बघीतला होता का? त्या मध्ये स्वातंत्र पूर्व काळात बाल विधवांचे कसे हाल व्हायचे याचे चित्रीकरण आहे
. त्याच काळातील अजून एका बालविधवेचे आयुष्य
कसे बदलले याची गोष्ट ऐका . वयाच्या दहाव्या वर्षी एक मुलगी बालविधवा झाली. घरच्यांनी
तिच्या हाती एकनाथी भागवत सोपवलं. सुदैवाने
देशपांडय़ांच्या घरात मुलीला अक्षर ओळख झाली होती. त्यामुळे निदान या भक्तिमार्गावरची
वाटचाल तरी करता आली. मिरजेला, आपल्या सासरघरच्या
अंगणात ती मुलगी एकनाथी भागवत वाचत बसलेली असता दारात एक तेजपुंज व्यक्ती उभी राहिली.
त्यावेळी सासूबाईंनी त्यांना दुधाची भिक्षा वाढली नाही, म्हणून ती मुलगी नाराज झाली.
पुढे पुन्हा परत तीच व्यक्ती भिक्षेसाठी आली आणि तसाच श्लोक ऐकू आला . त्या मुलीने
लगबगीने भिक्षा वाढली आणि त्यांना काही भागवतातील प्रश्न विचारले .ते साधू प्रत्यक्ष
समर्थ होते . समर्थानी त्या मुलीला उत्तरं अभंगात गुंफून दिले. या नंतर समर्थांची कीर्तनाला
जायला लागली आणि कीर्तने ऐकून भारावून गेली प्रत्येक कीर्तन पुढच्या रांगेत बसून एकदम
तल्लीन होऊन ऐकायची आणि भजन म्हणतांना भाव अनावर व्हायचा . कीर्तन संपल्यावर समर्थांनी
अनेक शंका विचारायची. त्या वेळेच्या समजला ते पसंद नव्हते त्यामुळे समाजातील काही लोकांनी
तिच्या घरच्यांच्या कानावर हे घातले. लोकांची
निंदा चालूच होती. कानावर जाईल अश्या पद्धतीने नको ते बोलणे सुरु केले. तिला त्रास देण्यात इतर स्त्रिया
आणि इतर विधवा सुद्धा पण आघाडीवर होत्या. सासरची
सगळी मंडळी मुद्दाम तिला जास्त काम सांगत म्हणजे तिला समर्थांच्या कीर्तनाला जायला
उशीर व्हावा किंवा जाताच येऊ नये. नंतर काही दिवसांनी समर्थ कोल्हापूरला गेले असे कळले.
माहेरपणाचे निम्मत साधून कोल्हापूरला जाण्याची परवानगी त्या मुलीने मागीतली.ती परवानगी
मिळाल्यावर दुसऱ्याच दिवशी ती मुलगी चालत मिरजेहून कोल्हापूर आली. कोल्हापूर ला समर्थांचे
कीर्तन अंबाबाईच्या देवळात होते . गाव बदललं तरी समाजाची दृष्टी तीच होती . तिथे सुद्धा
लोकांची निंदा आणि गाऱ्हाणी आता आई वडीलां कडे
जाऊ लागली. काही दिवस आई वडील गप्प बसले पण लोकांचे टोचून बोलणे सुरूच होते.
तिचे राम नाम आणि समर्थांची भक्ती सुरूच होते. तिने मनाचा हिय्या करून समर्थांना आपल्याला त्यांच्या बरोबर मठात घेऊन
जाण्याची विनंती केली. ती म्हणाली आज पर्यंत जेवढे कष्ट केले त्याच्या पेक्षा दुप्पट
कष्ट मी देवाच्या सेवे साठी करू इच्छिते. मला रामाच्या सेवे साठी रुजू करून घ्यावे.
पण समर्थ म्हणाले की आम्ही राना वनात कुठेही जातो त्यामुळे तुला ते जमणार नाही त्यामुळे
योग्य वेळ आली मी स्वतः येईन आणि तुला घेऊन जाईन. इतके ऐकल्यावर तिला हायसे वाटले.
हा सगळा प्रसंग काही समाजातील काही तथाकथित कुटाळ लोकांनी ऐकला आणि तिच्या वडिलांचे
कान भरले आणि आगीत तेल ओतले .त्या मुलीने आपली बाजू सांगायचा प्रयत्न केला पण त्याचा
काहीही उपयोग झाला नाही . आई वडिलांचा तिला घरीच डांबून ठेवले. गुरु बरोबर न्यायला
तयार नाहीत आणि आई वडील सुद्धा प्रेमाने समजून घेत नाहीत अशी असाह्य आवस्थेत तिची साधना
सुरूच होती. सामाजिक निंदा आणि आई वडिलांनी
कीर्तन प्रवचनांवर घातलेली बंदी याला तिने किती महिने धौर्यानें तोंड दिले पण
साधना सोडली नाही . राम नामाचा जप आणि ग्रंथांचे वाचन सुरूच होते. तिच्या श्रद्धेला
बिलकुल तडा गेला नाही . लोकांची पर्वा न करीत त्यांचे नीच बोलणे सहन करत तिचा राम नामाचा
जप सुरूच होता. आई वडिलांचा सय्यम तुटला. त्यांना
आता मुलगी काहीच ऐकत नाही आणि कुळाला कलंक लागेल
म्हणून सख्या मुलीवर विष प्रयोग केला आणि तिला खोलीत कोंडले. समाजानं धिक्कारल्यावर ज्या आई च्या कुशीत शिरायचे
त्याच आईने आणि वडिलाने तिला मारून टाकायचा कट रचला होता. इतक्या टोकाचे पाऊल उचलले
कारण त्या वेळेची विधवा मुलीनं असे बैराग्याच्या
नादी लागण चालत नसे . समाजाला तिची अध्यात्मिक उन्नती बघवली नाही.
आपल्याला मरावे लागते
याचे तिला वाईट वाटत नव्हते, पण जन्मदात्यांच्या
हातून विषय प्रयोग पचवणे अशक्य होत होते ,
शारीरिक वेदना असह्य होत होत्या खोलीत पाण्याचा थेंब नाही , घास कोरडा पडला, दरवाजे
आणि खिडक्या बंद , जीव घाबरायला लागला , आणि तिला चक्कर आली. तिने समर्थांची मना पासून
प्रार्थना केली कि मला शेवटच्या क्षणी तरी तुमचे दर्शन द्या किंवा माझा नमस्कार तरी
स्वीकार करा. तिने मनो मन हात जोडले, समर्थांची
प्रार्थना केली आणि त्यांना संपूर्ण अनन्य
भावाने शरण गेली. आणि काय आश्चर्य म्हणजे समर्थ प्रगट झाले. बाहेर आई वडिलाना कोणाचा
तरी आवाज ऐकू आला म्हणून खोली उघडली तर त्यांना समर्थ आणि संत वेण्णा बाई दिसले . आई
वडिलांना आपली चूक ध्यानात आली आणि त्यांनी सामर्थ्यांचा पायावर लोळण घेतले. घरच्यांनीही मग वेणाबाईला मठात जाण्यास परवानगी
दिली. पुढे श्री रामदास स्वामींच्या स्त्री-शिष्यांपैकी
फक्त वेणाबाईंनाच उभे राहून कीर्तन करण्याचा
अधिकार मिळाला होता. त्यांचा स्वत:चा शिष्य संप्रदाय निर्माण झाला होता, ही गोष्ट विशेषच
म्हणावी लागेल. हे सगळे या श्लोकाच्या पहिल्या दोन ओविंच्या अनुषंगाने सांगितले . संत
वेण्णा बाईंनी धौर्यनं तोंड दिले आणि समर्थांना अनन्य भावे शरण गेल्या . थोडक्यात वेण्णा
स्वामिनी समर्थांच्या श्लोका मधील दोन ओव्या आचरणात आणल्या मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे । मना बोलणे नीच
सोशीत जावे ॥
आता पुढील दोन ओव्यांचा
अर्थ स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे । मना सर्व
लोकांसि रे नीववावे ॥ ७ ॥, इथे समर्थ म्हणतात लोकांच्या कडून निंदा होणारच , प्रतिकूल
परिस्थिती येणार, इतर संकटे पण येतील तरी आपले मन शांत ठेवून आणि भगवत स्मरणात रममाण व्हावे. निंदक लोकांशी आपण खालच्या पातळी
वर जाऊन त्यांच्याशी वाद घालू नये आणि नम्रपणे उत्तर द्यावे. आपली बाजू समजावून सांगायचा प्रयत्न करावा पण त्यांना सुधारण्याचा
नादी जास्त लागू नये. लोकांशी वाद विवाद न घालता शांतपणे बोलावे. परमार्थात नम्रपणा
खूप महत्वाचा आहे . क्रोधाने साधनेवर विपरीत परिणाम होतो. साधकाची वाणी एकदम गोड आणि नम्र असावी आणि लोकांना ना दुखावता लोकांशी बोलावे . असे सांगळे गुण अंगी आत्मसात करणे
समर्थांना अपेक्षित आहे
|| जय जय रघुवीर समर्थ ||

