मना पापसंकल्प
सोडूनि
द्यावा
।
मना सत्य संकल्प जीवी
धरावा
॥
मना कल्पना
ते
नको
वीषयांची
।
विकारे घडे हो जनीं
सर्व
ची
ची
॥
५
॥
संकल्प म्हणजे पुढे काय करायचे आहे त्याचा मनात आलेला विचार. अर्थातच, समर्थ सांगताहेत की आपण पुढील क्रियांबद्दल जे ठरवशील ते केवळ शुद्ध, सत्याला अनुसरून आणि चांगलेच असावे. संकल्प हा निश्चयात्मक असतो आणि विचार किंवा कल्पना अनंत असतात. अमुक मिळवावं, अमुक व्हावं, अमुक घडावं, अमुक साधावं, अमुक करावं, अमुक टाळावं, अमुक स्वीकारावं, अमुक नाकारावं, अमुक टिकवावं.. असे अनंत विचार आणि कल्पना मनात क्षणोक्षणी येत असतात. त्याच एका कल्पनेला दृढ धरून ठेवले किंवा त्याचा ध्यास लागला की त्याचा संकल्प होतो . आपण जो जीवा पेक्षा जास्त सांभाळतो तो खरा संकल्प. पाप संकल्प सोडून द्यावीत आणि त्या साठी विषयात रमणारे मन भगवंता कडे वाळवावे . भगवांताच्या स्मरणाच्या एकमात्र संकल्पात मन रमून गेले तरच त्याने आत्मकल्याण साधेल भगवांत कडे मन वळवणे हे आपलां मुख्य काम आहे. तेव्हा भगवांताच्या प्राप्तीसाठीचे प्रयत्न हा आपला मुख्य संकल्प हवा आणि प्रपंच हा जोडधंदा .प्रपंचा मधील विषय भोगात मध्ये मन रमवू नये. पापपुण्याचा सामान्यपणे असा अर्थ करता येईल कीं जें ज्याच्या हिताचे, नुसते वरवरच्या सुखाचे नव्हें, तर अंतिम कल्याणाचे, तें त्याच्यासाठी पुण्य. शरीरापेक्षा मनाला आणि आत्म्याला अनुकूल तों तों अधिकाधिक पुण्यकारक. स्वैराचाराकडून संयमाकडे कडे मन वाळवणे म्हणजे पुण्य मार्गावर जाणे.
आता पापपुण्याची कल्पना आणि धर्म व नीति या गोष्टी परस्परांवर अवलंबून आहेत. पापपुण्याच्या कल्पना सर्वत्र व सर्व प्रकारच्या समाजामध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपांत आहेतच, त्या वेगवेगळ्या असतील; समर्थांच्या काळात त्याची व्याख्या वेगळी असेल आणि आजची वेगळी असेल . अमेरिकेत पाप पुण्य आणि भारतातील पाप पुण्य वेगळे असेल आणि कदाचित् परस्परविरुद्ध सुद्धा असतील. पण भगवंतच्या जवळ नेणारे संकल्प जगात कुठेही आणि केव्हांही तेच राहतील . भगवंता बद्दल चे विचार कायम सत्यच आणि चिरंतन राहतील. म्हणून समर्थ इथे सत्य संकल्प असा शब्द वापरतात आणि पुण्य संकल्प असे म्हणत नाहीत असे मला वाटते. म्हणून ते म्हणतात की भगवंत जवळ नेणारा संकल्प जीवा पलीकडे सांभाळावा . प्राणा पेक्षा तो संकल्प महत्वाचा वाटलं पाहिजे आणि त्यात कधीही खंड पडायला नको म्हणून समर्थ मनाला बजावत आहेत "मना सत्य संकल्प जीवी धरावा". रूढ अर्थाने स्वाभाविक सत्यसंकल्प, परोपकार, गरजू व्यक्तींना दान करणे ,त्याग, सेवा, तीर्थयात्रा, तप, पूजा, अध्ययन, नामस्मरण यासंबंधीचे विचार हे सारे सत्यसंकल्प. मी संयमाने राहीन, खरे बोलेन, न्यायाने वागेन, दुसर्याला शक्य ते सहाय्य करीन, योग्य आहार घेईन, दुसर्याला लागेल, बोंचेल असे बोलणार नाहीं, करणार नाही. स्वार्थासाठी कोणाची स्तुति करणार नाहीं. मत्सराने निंदा करणार नाहीं, अन्यायाचा प्रतिकार अवश्य करीन पण सूडबुद्धीने वागणार नाही, असे कित्येक विचार सत्यसंकल्पांत रूढ अर्थाने मोडतात. पण माझे असे मत आहे की या संकल्पामुळे पुण्य मिळेल पण ते सगळे खरे सत्य संकल्प होऊ शकत नाहीत. समर्थांना इथे फक्त भगवंता जवळ नेणारे संकल्प म्हणजेच भक्ती मार्गात वर्णन केलेले संकल्प फक्त अभिप्रेत आहे.
शरीर, मन, बुद्धि यांना आपापल्या पातळीवर कांहीं आवश्यकता असतात व त्या पुर्या करणेहि इष्ट असते. आवश्यकतेच्या मर्यादेच्या आंत त्यांची पूर्तता करणे यांत वाईट कांहींच नाहीं. परंतु मोहाने ही मर्यादा कळत नकळत ओलांडली जाते. सुखाच्या कल्पना, अति विषयासक्ति आणि विकृति, विकार या क्रमाने मूळच्या आवश्यकते पेक्षा जास्त विकारांच्या आधीन होणे हितकारक नाही . अति पैसे , अति महत्वाकांक्षा , अति मोह , अति क्रोध , अति मत्सर या वाटेवर मनुष्य गेला तर षड्रिपूंचा मनुष्याच्या वृत्तीवर वाईट परिणाम होतो आणि अधःपात होऊ लागतो आणि त्याची परिणति शेवटी लोकांमध्ये अशा व्यक्तीची छी थू होण्यांत होते. भारतीय क्रिकेट चा कप्तान अझरुद्दीन याचे उत्तम उदाहरण देता येईल . अझरुद्दीनकडे फलंदाजीचे कौशल्य होते, धावा निघत होत्या, पैसे अमाप होते ,कप्तानपद मिळालेलं होते पण विकारांच्या आहारी जाऊन MATCH FIXING मधून अजून पैसे मिळवण्याचा मोह त्याला आवरता आला नाही. त्यामुळे त्याची समाजात छी थू झाली आणि त्याला शिक्षा सुद्धा झाली. समर्थ सांगतात त्याप्रमाणे "विकारें घडे हो जनीं सर्व ची ची" हा व्यावहारिक नियम फार महत्त्वाचा आहे. हा धाक जर प्रत्येकाच्या मनांत राहील तर दुर्वर्तन होण्याचे कारणच राहणार नाही.
|| जय जय रघुवीर समर्थ
||
